रायगड (स्वप्नील राठोड) : दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची आमदार महेश बालदी यांनी भेट घेतली असून उरण ते नेरूळ या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गाच्या संदर्भात केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी या उरण – नेरूळ रेल्वे प्रकल्प संदर्भात रेल्वे मंत्र्यांशी सकारात्म चर्चा झाली असल्याचे आमदार महेश बालदी यावेळी म्हणाले.
आमदार बालदी म्हणाले की, प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच सध्याच्या 40 फेऱ्यांऐवजी 50 फेऱ्या सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लवकरात लवकरच या प्रस्तावाचे अंमलबजावणी होणार आहे. यामुळे उरण व नेरूळ परिसरातील प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुकर, सोयीस्कर आणि वेळेवर होणार आहे.या बैठकीत केवळ रेल्वेमार्ग, फेऱ्या वाढविण्याबाबतच नव्हे, तर प्रवाशांना भेडसावणाऱ्या इतर प्रश्नांवरही सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असल्याचे बालदी यावेळी म्हणाले.
आमदार बालदी पुढे म्हणाले की, स्टेशनवरील सुविधा, वेळापत्रकातील नियमितता, तांत्रिक अडचणी आणि स्थानिक गरजांबाबत मांडणी करून त्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरच ठोस पावले उचलली जाणार आहेत. उरण-नेरूळ परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नेहमीप्रमाणेच मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांना दिलासा मिळणार असून रेल्वे सेवेमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असल्याचा विश्वास आमदार बालदी यांनी यावेळी व्यक्त केला.