ठाणे (प्रतिनिधी) : इतिहासातील अनेक संदर्भ अभ्यासले असता समर्थ रामदास लिखित मनाचे श्लोक आणि दासबोध हे जीवन मार्गदर्शक ग्रंथ असून त्यांचे समाजजीवनात अमूल्य असे योगदान असल्याचे प्रतिपादन दासबोध ग्रंथाच्या अभ्यासिका मीरा लिमये यांनी केले. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या दीपाली हरेश देशपांडे लिखित दासबोध दर्शन या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर लेखिका दीपाली देशपांडे आणि प्रकाशक डॉ. संतोष राणे उपस्थित होते.लेखिका दीपाली हरेश देशपांडे यांच्या दासबोध दर्शन या पुस्तकाचे रविवारी ठाण्यातील सहयोग मंदिर येथे दासबोधाच्या अभ्यासक मीरा लिमये यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, “लोकमान्य टिळक यांनी तुरुंगात असताना गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. तुरुंगात असताना टिळकांनी जे ग्रंथ अभ्यासले त्याची यादी उपलब्ध आहे त्यात टिळकांनी तुरुंगात ५२ वेळा दासबोध हा ग्रंथ अभ्यासासाठी मागवला होता अशी नोंद सापडते. वासुदेव बळवंत फडके जेव्हा गोंदवलेकर महाराज यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की ‘तुम्ही समर्थ व्हा आणि मी शिवाजी होतो’ दासबोधातील अनेक ओव्यांच्या आधारे आजच्या काळातही त्याचे महत्त्व टिकून आहे. भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील अनेक नेत्यांनी या ग्रंथातून प्रेरणा घेतल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. म्हणूनच मराठी भाषा आणि मराठी ग्रंथ पुढच्या पिढीला समजले पाहिजेत, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच संत-महात्म्यांविषयी बोलताना लोकांनी जबाबदारीने बोलावे, त्यांची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी.”
या वेळी लेखिका दीपाली हरेश देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संतसाहित्याचे अभ्यासक असणारे त्यांचे वडील व लेखिका असणारी आई यांच्याकडून त्यांना हा वारसा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
दासबोध समर्थ रामदास स्वामींनी सतराव्या शतकात लिहिलेला ग्रंथ आहे. आजही त्यातील आशय महत्त्वाचा आहे. परंतु त्या काळातील भाषा आणि आजच्या काळातील गतिमान जीवन यामुळे ग्रंथवाचनासाठी वेळ काढणे लोकांना अवघड जाते. म्हणूनच या ग्रंथातील आशय थोडक्यात आणि सोप्या शब्दात लिहून तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दासबोध दर्शन हे पुस्तक लिहिल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हरेश देशपांडे यांनी केले तर निवेदन सिद्धार्थ देशपांडे यांनी केले.शारदा प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या समारंभास ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

