‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप सोहळा!
पंढरपुर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने आयोजित आणि 'महाराष्ट्र कला संस्कृती मंचच्या संयोजनातून ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप सोहळा मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, मंत्री गिरीष महाजन, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार जी (भा.प्र.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडला.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले, “हा उपक्रम पर्यावरण जनजागृतीत मोलाची भूमिका बजावत असून यावर्षीच्या वारीचे स्वरूप अत्यंत वेगळे आणि विशेष आहे. वर्तमानात पर्यावरण प्रदूषणाचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत, त्यामुळे यातून निर्माण होणारी जनजागृती ही काळाची गरज आहे." कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार जी (भा.प्र.से.) यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषण नियंत्रणासाठी कशा पद्धतीने आग्रही भूमिका घेऊन कार्य करत आहे, याबद्दल माहिती देत त्यांनी वारीतील सर्व लोककलाकारांना शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात विविध लोककलांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा मोलाचा संदेश देण्यात आला. यामध्ये ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांनी प्रबोधनात्मक कीर्तन सादर केले. तर संध्याताई साकी यांनी भारुड सादर केले आणि शाहीर कल्पना माळी, शाहीर पृथ्वीराज माळी यांनी पोवाडा सादर केला. या संपूर्ण वारीचे संयोजन 'महाराष्ट्र कला संस्कृती मंच' यांनी केले होते आणि त्याची प्रमुख जबाबदारी संजय भुस्कुटे यांनी पार पाडली.
या समारोप सोहळ्याला मंडळाचे सहसंचालक जगन्नाथ साळुंके, पुण्याचे प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे, जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे, लोककलांचे गाढे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, महाराष्ट्र कला संस्कृती मंचच्या अध्यक्षा सुखदा खांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी बंधू-भगिनी उपस्थित होत्या.
#AshadhiWari2026 #AshadhiWari #paryavarnachivaripandhrichyadari#Pandharpur #MPCB
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषण.
संबंधित बातम्या
या श्रेणीमध्ये इतर बातम्या नाहीत.