भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन
मुंबई (कविराज चव्हाण) : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 44 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यात कल्याण – डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक 15 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. या सर्व विजयी उमेदवारांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत होती. ही मुदत संपल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे 44 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले.
कल्याण – डोंबिवली 15, पुणे 2, पिंपरी चिंचवड 2, पनवेल 6, भिवंडी 6, धुळे 4, जळगाव 6, अहिल्यानगर 3 असे एकूण भाजपा चे 44 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. ही बिनविरोध निवड म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार करत असलेल्या विकास कामांवर मतदारांचा असलेला विश्वास आहे. कारण मतदार भाजपा उमेदवारालाच निवडून देणार याची खात्री विरोधी उमेदवारांनाही असल्यामुळे त्यांनी माघार घेतली असे चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नमूद केले.

