तामिळ समाजाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना गर्दी जमवून उत्तर
मुंबई (कविराज चव्हाण ) : मुंबईमध्ये भाजप आमदाराच्या वक्तव्याने पुन्हा एकदा नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. आमदार तमिळ सेल्वन यांच्या वक्तव्याने तमिळ-मराठी वाद निर्माण होण्याची शंका व्यक्त केली जात आहे. आमच्याविरोधात बोलाल तर मुंबईत लाखोंचा मोर्चा काढू असा इशारा त्यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता दिला. सायन-कोळीवाडा परिसरात काल भगवान मुरुगन यांच्या भक्तांचा जनसागर उसळला होता. ‘थैपूसम’ उत्सवानिमित्त आयोजित भव्य ‘पाळकुडम कावडी अट्टम’ रॅलीत हजारो भाविक सहभागी झाले होते. भाजप आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीला आता राजकीय वळण मिळाले आहे. सेल्वन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तमिळ भाषिकांवरील टीकेला थेट प्रत्युत्तर दिले आहे.
भगवान मुरुगन यांच्या उत्सवानिमित्त सायन कोळीवाडा ते माटुंगा येथील ऐतिहासिक मुरुगन मंदिरापर्यंत ही भव्य रॅली काढण्यात आली. पारंपरिक वाद्ये, कावडी आणि हजारो तमिळ बांधवांच्या उपस्थितीने हा परिसर दुमदुमून गेला होता. सायनमधील तमिळ समुदायाची एकजूट दाखवण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.रॅलीदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार तमिळ सेल्वन कमालीचे आक्रमक पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी तमिळ भाषिकांच्या मुद्द्यावरून केलेल्या विधानाचा समाचार घेत सेल्वन म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी एका मोठ्या नेत्याने तमिळ बांधवांच्या विरोधात विधान केले होते.
. आजची ही गर्दी आणि ही रॅली त्या वक्तव्याला उत्तर आहे. आम्हाला कोणीही विनाकारण वाईट बोलू नका, अन्यथा त्याचे परिणाम काय असतील हे आज दिसून आले आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, येत्या एका महिन्यात मुंबईत १ लाख तमिळ बांधवांची याहून मोठी रॅली काढून आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असा इशारा सेल्वन यांनी दिला.तमिळ सेल्वन यांनी थेट राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांना दिलेले हे आव्हान मुंबईतील स्थानिक राजकारणात नव्या वादाला तोंड फोडण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान, भाजपचे तामिळनाडूमधील नेते अण्णामलाई यांनी मुंबई हे महाराष्ट्राचे नसल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत ताशेरे ओढत बोचरी टीका केली होती.

