संपूर्ण कोकण विभागातील सदस्यांची होणार नोंदणी
ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यात देशातील आणि राज्यातील विविध भागातून आलेल्या बंजारा समाजाची संख्या हजारोच्या संख्येत असून या बंजारा समाजातील नागरिकांना राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाभ मिळावे तसेच बंजारा समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकृत अशी समिती हवी म्हणून रविवारी समाजाच्या काही प्रमुख लोकांनी एकत्र येत बंजारा संघर्ष समितीची स्थापना केली आहे. सरकार किंवा इतर महत्वाच्या लोकांशी संपर्क करण्यासाठी ही समिती पुढाकार घेणार असून सरकार दरबारी ही समिती बंजारा समाजाच्या समस्यांचा निवारणासाठी पाठपुरावा करणार असल्याचे या समितीकडून घोषणा करण्यात आली.
रविवारी ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन केले होते, या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी समितीचे नाव ठरविण्यात आले असून या समितीकडून पालघर पासून सिंधुदुर्गपर्यंत प्रत्येक विभागात दौरा करण्यात येणार असून या कोकण विभागात काम करणाऱ्या सक्रिय सदस्यांची नियुक्ती यावेळी करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यात १६ नोव्हेंबर पासून दौरा सुरू करण्यात येणार असून नागरिकांची नोंदणी यावेळी करण्यात येणार आहे. या समितीमध्ये मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ नेते आदिनाथ चव्हाण यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, युवकांना रोजगार, युवकांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज, सरकारी योजना तांड्यात आणणे, एमपीएससी – युपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी मदत करणे अशी विविध उपक्रम या बंजारा संघर्ष समितीच्यावतीने राबविण्यात येणार आहे.
या समितीचे सदस्य म्हणाले की, बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यातील विविध भागात मोर्चे आंदोलने करण्यात आली होती त्याचप्रमाणे ठाण्यात बंजारा आरक्षण समितीच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आले होते मात्र या आंदोलनाचा फायदा घेत काही नेत्यांनी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बंजारा समाजाचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी आणि समाजाचे प्रश्न सरकारकडे जाऊन सोडविण्यासाठी ही बंजारा संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

